हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्याच्या विविध भागात शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने विविध पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहेत. मात्र औरंगाबादेत आंदोलनाच्या माध्यमातून भारी तोडगा निघाला आहे. शेतकऱ्यांना केवळ आश्वासनच नाही तर महावितरांमुळे नुकसान झाल्यास नुकसानभरपाई दिली जाणार असल्याचे पत्र अभियंत्यांकडून आंदोलकांना देण्यात आले आहे.
आता तुम्ही म्हणाल ही घटना कुठे घडली आहे ? तर ही घटना वैजापूर कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत घडली आहे. कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला होता. दरम्यान, महावितरणच्या कारभाराचा पाढाच त्यांनी वाचला. आता महावितरणमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर भरपाई दिली जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता दौड यांनी पत्राद्वारे सांगितले आहे. महावितरणमुळे नुकसान झाल्यास आता भरपाईही दिली जाणार आहे. कार्यकारी अभियंत्याने याबाबतचे पत्र आंदोलकांना दिले आहे. त्या पत्रानुसार 48 तासात जर रोहित्र दिले नाही तर प्रति तास 50 रुपये याप्रमाणे ग्राहकास रक्कम दिली जाणार आहे. तर 48 तासांमध्ये रोहित्र न दिल्यास 50 रुपये प्रति ग्राहकास दिले जाणार आहेत. वीज ग्राहक वेगवेगळ्या बाबतीत रुपये 25 व 50 अशाप्रमाणे नुकासनभरपाई अदा केली जाणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान , महावितरणचे लेखी पत्रच असल्याने जर नियमाप्रमाणे विद्युत पुरवठा आणि दुरुस्तीची कामे झाली नाहीत तर शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईसाठी अर्ज करावेत. दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मदत न मिळाल्यास पुन्हा आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे.