हॅलो कृषी ऑनलाईन : आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची मोठी बैठक सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील खोडशी येथे पार पडली. या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली विविध निर्णय घेण्यात आले. या बैठकीमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे लढणार असल्याचा ठराव या बैठकीमध्ये घेण्यात आल्याची माहिती स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांनी दिली आहे.
त्याचबरोबर पुढे माहिती देताना ते म्हणाले, स्वाभिमानीकडून राज्यामध्ये दौरे करण्यात येतील. त्याचबरोबर ऊस असेल सोयाबीन, कापूस असेल किंवा कांदा असेल या संदर्भात आंदोलनाची रणनीती या बैठकीमध्ये ठरवण्यात आल्याची माहिती ही रविकांत तुपकर यांनी दिली.
सध्या महाराष्ट्रातली राजकीय स्थिती ही भरकटलेली आहे. सामान्य माणसाचा विश्वास लोकप्रतिनिधींच्या वरून उडालेला आहे. त्यामुळे एक पोकळी निर्माण झाली आहे. अशावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सामान्य माणसासाठी आधार म्हणून पुढे यायचं असा ठरावही बैठकीत मंजूर झाल्या असल्याचं रविकांत तुपकर यांनी या बैठकीनंतर सांगितलं