Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. पुरांमुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. अशात आता हवामान विभागाने महाराष्ट्रातील ४ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील २-३ दिवसांत राज्यात ढगफुटीसारखा मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे चेक करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
कोणकोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट?
हवामान विभागाने (दि. २६) राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. हवामान विभागाने आज रत्नागिरी, रायगड, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेड, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर राज्यातील उर्वरित जिल्हयांना जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असलेल्या भागातील लोकांनी सतर्क रहावे, स्थानिक व शासकीय यंत्रणेकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे, असे हवामान खात्याने आवाहन केले आहे.
कोणत्या धरणात किती पाणीसाठा?
धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे राज्यातील अनेक धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. पुण्याजवळील खडकवासला धरणात ९१.८१ टक्के, पानशेत धरणात ६७.८८ टक्के, वरसगाव धरणात ६१.४० टक्के तर टेमघर धरणामध्ये ४५.२३ टक्के इतका जलसाठा शिल्लक आहे.