हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी आणि त्यांच्या दावणीला असलेल्या गाय, बैल (Bull Cremation) आणि म्हशींशी त्यांचे वेगळे नाते असते. हे सगळे प्राणी शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग बनतात. याचपैकी एखाद्या प्राण्याचा मृत्यू झाला तर त्याचा परिणाम सगळ्या कुटुंबियांवर होतो. राज्यात एखाद्या शेतकऱ्याच्या गुणी बैलाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची अंत्ययात्रा काढल्याचे अनेक घटना अलीकडे समाज माध्यमांवरून समोर येत असतात. अशातच आता मध्यप्रदेशातील एका शेतकऱ्याने आपल्या दोन बैलांच्या मृत्युनंतर त्यांचे गंगा नदीवर अंत्यसंकार केले असून, 300 लोकांच्या उपस्थित दहावा जेवण देखील घातले आहे. या शेतकऱ्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी गंगा नदीवर जात आपल्या लाडक्या बैलांच्या अस्थी गंगेत (Bull Cremation) अर्पण केल्या आहेत.
बैलांचा अपघाती मृत्यू (Bull Cremation Bones Immersed In Ganga)
मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील भानपुरा हे छोटेसे शहर आहे. येथील शेतकरी भवानी सिंह आणि उल्फत सिंह या दोघा भावांनी तीस वर्षांपूर्वी एक बैलजोडी खरेदी केली होती. दोघा भावांनी आपल्या लाडक्या बैलांचे नाव श्यामा आणि माना ठेवले होते. मात्र, सर्व काही ठीक सुरु असताना 16 डिसेंबर रोजी त्यांच्या या दोन बैलांचा अपघाती मृत्यू झाला. उल्फत सिंह हे नेहमीप्रमाणे आपल्या श्यामा आणि माना या दोन बैलांना घेऊन शेतातून गाडी घेऊन येत होते. मात्र रात्री शेतातून येताना अंधार पडल्याने, उल्फत सिंह आणि दोघेही बैल गाडीसहित विहिरीत पडले. घटनास्थळीच श्यामा या बैलाचा मृत्यू झाला होता. तर दुसरा बैल माना याने दोन दिवसांनंतर प्राण सोडला. उल्फत सिंह यांना या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही. आपल्या लाडक्या बैलांचा अपघाती मृत्यू झाला या दुःखात दोघा भावांनी त्यांच्या अस्थी गंगेत विसर्जित करण्यासह अंतिम संस्कार करण्याचा निर्णय घेतला.
300 लोकांना दहाव्याचे जेवण
भवानी सिंह आणि उल्फत सिंह या दोघा भावांनी आपल्या लाडक्या बैलांचे रीति-रिवाजासह गावात अंतिम संस्कार (Bull Cremation) केले. त्यांनतर त्यांनी आज उत्तरप्रदेशातील सोरो या ठिकाणी गंगा नदीवर जात पूजाविधी करत गंगा नदीत दोन्ही बैलांचे अस्थी विसर्जन केले आहे. आज या दोन्ही बैलांच्या अंतिम संस्काराच्या कार्यक्रमाला पाहुण्यांसह पंचक्रोशितील जवळपास 300 लोक उपस्थित होते. भवानी सिंह आणि उल्फत सिंह यांनी रिती-रिवाजाप्रमाणे पाहुण्यांना दहाव्याचे जेवण ठेवले होते.
मागील 30 वर्षांपासून श्यामा आणि माना या दोघा बैलांनी आम्हाला शेतीमध्ये खूप साथ दिली आहे. अगदी लहान वासरे असताना आम्ही त्यांना खरेदी केले होते. मात्र आज इतक्या दिवसानंतर घडलेली ही घटना मनाला चटका लावून जाणारी असल्याने आम्ही त्यांच्या अंतिम संस्कारासह दहावा करण्याचा निर्णय घेतल्याचे सिंह बंधू सांगतात. आजकाल म्हाताऱ्या आणि वयोवृद्ध लोकांना समाजात व्यवस्थित संभाळले जात नसताना भवानी सिंह आणि उल्फत सिंह या दोघा भावांनी आपल्या बैल जोडीचे केलेले हे अंत्यसंस्कार नक्कीच समाजाला चपराक लावणारी गोष्ट आहे.