हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात अनियमित आणि असमान पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यातच राज्यातल्या बहुतांशी भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे पिके पाण्याखाली गेली आहेत. मात्र शेतकऱ्यांना पीक विमा हा मोठा आधार होऊ शकतो. पिकांचा पंचनामा , नुकसानभरपाईची प्रक्रिया याबाबत जणून घेऊया…
नैसगिंक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास कृषी विभाग जास्तीचे नुकसान झाले. असल्यास महसूल विभागाला पंचनामा करण्याचे आदेश शासनाकडून दिले जातात. पिकाची पेरणी झाली की, त्या पिकाची विमा रक्कम अदा करणे आवश्यक आहे. पिकानिहाय ही रक्कम विमा कंपनीने ठरवून दिलेली असते. पिकाचे नुकसान झाले असल्यास त्या संबंधिची माहिती ही कृषी सहाय्यक, ग्रामसेवक किंवा तलाठी यांना देणे आवश्यक आहे. यानंतर पिक पाहणीसाठी कृषी विभागाचे किंवा महसूल विभागाचे अधिकारी हे शेतकऱ्यांच्या बांधावर येतात.
आवश्यक कागदपत्रे
१)सातबारा उतारा,
२)रेशन कार्डची झेरॉक्स
३)आधार कार्ड
४) बॅंक पासबुकची झेरॉक्स
25 टक्के क्षेत्र बाधित असल्याचा अहवाल येणे आवश्यक
पिक पेऱ्याचे क्षेत्र, बाधित क्षेत्र तसेच तुलनेने किती क्षेत्रावरील नुकसान झाले आहे याचा अहवाल या कर्मचाऱ्यांकडून तयार केला जातो. पिक पंचनाम्याचा अहवाल हा महसूल विभागाकडे पाठविला जातो. महसूल विभागाकडून नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल हा संबंधित कंपनीकडे पाठविला जातो. मात्र, नुकसान भरपाईसाठी लागवडीच्या क्षेत्रापैकी किमान 25 टक्के क्षेत्र बाधित असल्याचा अहवाल येणे आवश्यक आहे. नुकसान अहवालाची पाहणी केल्यानंतरच शेतकऱ्याकडून घेण्यात आलेल्या बॅंक पासबुकच्या खात्यावर ही भरपाईची रक्कम वर्ग केली जाते. पंचनामा कसा केला जातो याची माहिती तलाठी सुदर्शन पाटील यांनी दिली आहे.
संदर्भ -टीव्ही ९ मराठी