हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी
आगामी खरीप हंगामात पेरणीसाठी सोयाबीन बियाणांसाठी वणवण भटकंती न होण्याकरीता तसेच काही खाजगी कंपन्याचे निकृष्ट दर्जाचे बियाणे खरेदी केल्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी घरगुती सोयाबीन बियाणे पेरणीकरीता राखुन ठेवावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, परभणी यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कृषी विभागाच्या माध्यमातून या वर्षी देखील सोयाबीन ग्रामबिजोत्पादन मोहिमेद्वारे सोयाबीन राखुन ठेवण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर जनजागृती करण्यात येत आहे. या मोहिमेस प्रतिसाद देत शेतकरी बांधवांनी बियाणेकरीता तसेच बाजारभावाच्या दृष्टीकोनातून आपले शेतीतील सोयाबीन घरगुती पध्दतीने जतन देखील केले आहे. आगामी काळात शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारी ही एक अत्यंत चांगली व महत्वाची बाब ठरणार आहे. तरी शेतकऱ्यांनी सद्यस्थितीत घरगुती सोयाबीनचे व्यवस्थितपणे जतन करुन पुढील हंगामात उगवण क्षमता चाचणी, बीजप्रक्रिया तसेच सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करुन पेरणी करावी असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.