हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे होणे महत्वाचे असते जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळू शकेल. मात्र पंचनामा म्हणजे नेमका काय ? त्याची प्रक्रिया काय ? भरपाईसाठीच शेतकरी पात्र कसे ठरणार ? याबाबत जाणून घेऊया ..
1) जास्तीचे नुकसान झाले असल्यास कृषी विभाग तसेच महसूल विभागाला पंचनामे करण्याचे आदेश शासनाकडून दिले जातात.
2) पिकाची पेरणी झाली की, त्या पिकाची विमा रक्कम अदा करणे आवश्यक आहे. पिकानिहाय ही रक्कम विमा कंपनीने ठरवून दिलेली असते.
3) पिकाचे नुकसान झाले असल्यास त्या संबंधिची माहिती ही कृषी सहाय्यक, ग्रामसेवक किंवा तलाठी यांना देणे आवश्यक आहे. यानंतर पिक पाहणीसाठी कृषी विभागाचे किंवा महसूल विभागाचे अधिकारी हे शेतकऱ्यांच्या बांधावर येतात. आता मात्र, सरसकट नुकसान झाल्याने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
4) या दरम्यान शेतकऱ्याजवळ सातबारा उतारा, रेशन कार्डची झेरॉक्स, आधार कार्ड आणि बॅंक पासबुकची झेरॉक्स आवश्यक आहे.
5) पिक पेऱ्याचे क्षेत्र, बाधित क्षेत्र तसेच तुलनेने किती क्षेत्रावरील नुकसान झाले आहे याचा अहवाल या कर्मचाऱ्यांकडून तयार केला जातो.
6) पिक पंचनाम्याचा अहवाल हा महसूल विभागाकडे पाठविला जातो.
7) महसूल विभागाकडून नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल हा संबंधित कंपनीकडे पाठविला जातो. मात्र, नुकसान भरपाईसाठी लागवडीच्या क्षेत्रापैकी किमान 25 टक्के क्षेत्र बाधित असल्याचा अहवाल येणे आवश्यक आहे.
8) नुकसान अहवालाची पाहणी केल्यानंतरच शेतकऱ्याकडून घेण्यात आलेल्या बॅंक पासबुकच्या खात्यावर ही भरपाईची रक्कम वर्ग केली जाते. पंचनामा कसा केला जातो याची माहिती तलाठी सुदर्शन पाटील यांनी एका टीव्ही माध्यमाशी बोलताना दिली आहे.
ऑनलाईनसाठीच्या अडचणी
ऑनलाईनद्वारे नुकसानीची माहिती भरण्याचे अवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. मात्र, शेतामध्ये पाणी साचल्याने पंचनामे करण्याच्या प्रक्रीयेस अडचणी निर्माण होत आहेत.अतिवृष्टीमुळे सर्रास शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पंचनामे किंवा पिकांची पाहणी करण्यासाठी कंपनीकडे मनुष्यबळ नाही. आता नु्कसानीनंतर हे अॅप वापरणाऱ्यांची संख्या देखील वाढली असावी. त्यामुळे अधिकतर हे अॅप कार्यरत होत नाही. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे तर हे अशा प्रकारचे अॅपच नसल्याने अडचणी वाढत आहेत.