हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या वाट्याचे प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे पैसे देणे बंधनकारक आहे. ही रक्कम दूध उत्पादक शेतकऱ्यांना देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली वरळीतील दुग्धविकास आयुक्त कार्यालयावर बुधवारी 29 रोजी दुपारी एक वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी थकित बिल मागण्यासाठी दूध उत्पादकांनी उपस्थित राहावे असे आवाहन क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेड शेतकरी संघटना अध्यक्ष शिवाजी नांदखिले यांनी केले आहे.
याबाबत बोलताना शिवाजी नांदखिले म्हणाले, महाराष्ट्रातील गाईच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला प्रति लिटर 27 रुपयांसाठी पहिला जीआर दिनांक 19 जून 2017 रोजी काढला. त्यानंतर झालेल्या राजू शेट्टींच्या आंदोलनातील तडजोडी नुसार सरकारनं 20 अधिक पाच दरासाठी जीआर 27 सप्टेंबर 2018 रोजी काढला. या दोन्ही जीआर मधील अंतर एक वर्ष तीन महिने सहा दिवस अंतरातील शेतकऱ्यांच्या दूध घरातील फरकाचे बिल महाराष्ट्रातील सुमारे (८३७०)आठ हजार तीनशे सत्तर कोटी रुपये इतका आहे. दूध बिलासंदर्भात शेतकरी संघटनेच्या वतीने कोर्टात जाऊन शेतकरी संघटनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष हरिदास पवार आणि पुणे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते यांनी कोर्टातून सिद्ध करून आणले त्यामुळे ही थकीत रक्कम मिळण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.