हॅलो कृषी ऑनलाईन : कधी जास्त पाऊस कधी पावसाची उघडीप यामुळे बुलढायाण्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतकरी मोठ्या हिंमतीने पीक घेण्याचा प्रयत्न करतो आहे. मात्र निसर्ग पुन्हा खेळ खेळतो आहे.
बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते आणि हे पीक शेतकऱ्याच्या दृष्टीने नगदी पीक समजले जाते, जिल्ह्यात गेल्या वर्षी 3 लाख 84 हजार हेक्टर क्षेत्रफळावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली होती, तर यावर्षी आतापर्यंत 3 लाख 55 हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. बुलडाणा जिल्ह्यात गेल्या तीन चार वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना नापिकीला सामोरे जावे लागत आहे. दीड दोन वर्षांपासून कोरोनामुळे तर सर्वकाही ठप्प असल्याने याचा आर्थिकदृष्ट्या मोठा परिणाम शेतकऱ्यांवर झाला आहे. मजुरी नाही… पिकाला भाव नाही, तरीही या सर्वांवर मात करत शेतकऱ्याने खाजगी कर्ज काढून शेतीची मशागत करून पेरणीची तयारी केली होती. खरिपाच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील जवळपास 94 टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली…
पिकांवर किडींचा हल्ला
–आज रोजी वरून हिरवे दिसणारे पीक कीटकांच्या आक्रमणाने पोखरले जात आहे
— या पिकावर चक्राभुंगा आणि खोडअळी ने आक्रमण केले आहे
— त्यामुळे शेतकऱ्याने कीटकनाशकांची दोन वेळा फवारणी केली.
–मात्र अजूनही त्याचा प्रादुर्भाव पूर्णपणे नष्ट झालेला नाही.
त्याच बरोबर गेल्या आठवड्यात जिल्हाभर संततधार सुरू असल्याने सोयाबीन पिकात मोठ्या प्रमाणात गवत आणि विविध प्रकारचे तण झाले. त्यावर शेतकऱ्याने परत दोन वेळा तणनाशकं फवारून देखील हे तन नष्ट झाले नाही. त्यामुळे यावर्षी मशागतीचा खर्च दुप्पट तिप्पट वाढलाय आणि एवढं करूनही सोयाबीन चे उत्पन्न किती होईल या विचाराने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडलाय.