हॅलो कृषी ऑनलाईन : कधी अवकाळी , कधी ढगाळ वातावरण, कधी गारपीट लहरी वातावरणाचा परिणाम हंगामातल्या मुख्य पिकावर तर झाला आहेच मात्र थोडाफार पैसे हातात येईल म्हणून शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकवला मात्र त्यावरही कोरोनाचे सावट आहेच . लातूर जिल्ह्यामध्ये कोरोनच्या प्रादुर्भावामुळे आठवडी बाजरा बंद आहेत. तरीही काहीतरी हाताला मिळेल या आशेने एका शेतकऱ्याने किनगाव येथील आठवडी बाजार गाठला पण या शेतकऱ्याची मेथी खरेदी करायला कुणी आले नाही. म्हणून नाईलाजाने शेतकऱ्याने मेथीच्या जुड्या भिरकावून टाकल्या…. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की ,किनगावच्या आठवडी बाजारात आसपासचे शेतकरी आपला भाजीपाला विकायला घेऊन येत असतात. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. तरी देखील काढलेला शेतमाल करायचा काय ? म्हणून शेतकऱ्याने आपल्या मेथीच्या जुड्या विकण्यासाठी आणल्या खऱ्या मात्र दिवसभर थांबून देखील मेथीची एकही जुडी विकली गेली नाही याची खंत मनात होती. शिवाय माल पुन्हा घरी नेऊन करायचा काय ? या विवंचनेत शेतकरी होता शेवटी शेतकऱ्याने मेथीच्या जुड्या भिरकवायला सुरुवात केली. शिवाय जुडी कुणी घेऊ लागला तरी त्याला तो घेऊ देत नसल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. तीन महिने कष्टाने फुलवलेली मेथी अशाप्रकारे फेकून देण्याची नामुष्की शेतकऱ्यावर ओढावली आहे.