हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होऊन उत्पादनात घट होणार आहे. लातूर जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाचा फटका पिकांना बसला आहे. आता या पसानंतर पिकांवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपात काही हाती लागणार की नाही या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे.
सोयाबीनवर करप्याचा प्रादुर्भाव
मागील वर्षी खरिप पिकांचे नुकसान होऊल देखील यंदा सोयाबीनच्या पिकावर शेतकऱ्यांनी भर दिला होता. लातुरची बाजारपेठ आणि नगदी पिक म्हणून शेतकरी सोयाबीनला प्राधान्य देत आहे. मध्यंतरी पावसामुळे पिकाचे तर नुकसान झाले आहेच परंतु, आता ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे.हवामानातील आर्द्रता वाढत असून बुरशी वाढीस वातावरण तयार झाल्याने सोयाबानची पाने ही पिवळी पडत आहेत. त्यामुळे उत्पादनात घट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी या परिसरात केवळ सोयाबीनचेच उत्पादन घेतले जाते. त्यामुळे पिकाची फेरपालट ही गरजेची आहे. मात्र, उत्पादनापोटी शेतकरी हे सोयाबीनलाच पसंती देत आहेत. खरिप हंगामाच्या सुरवातीला पावसाने ओढ दिली होती. यानंतर किडीची प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी फवारणीची कामे करावी लागली होती. आता सोयाबीन बहरात असतानाच मुसळधार पाऊस आणि आता पावसाने उघडीप दिली तर किडीचा प्रादुर्भाव. त्यामुळे खरिपात शेतकऱ्यांच्या पदरी नेमके काय पडणार हे पहावे लागणार आहे.
असे करा व्यवस्थापन
करप्या रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोन्याझोल आणि सल्फर 20 ग्रम प्रती 10 लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारणे आवश्यक आहे. शिवाय गरजेनुसार 10-20 मिली स्टिकचा वापर केल्याने किडीचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे कदम यांनी सांगितले.
याबाबत माहिती देताना उपविभागीय अधिकारी राजेंद्र कदम यांनी सांगितले की, लातुर जिल्ह्यात खरिप हंगामात सोयाबीन हेच मुख्य पिक आहे. दरवर्षी रब्बीच्या सरासरीच्या क्षेत्रात घट होत आहे तर खरिपातील सोयाबीन वाढत आहे. शेतकऱ्यांनी पिकांची फेरपालट करुन आर्द्रता कमी करण्यासाठी बीबीएफ पध्दतीने पेरणी करणे आवश्यक आहे. पेरणीपुर्वी बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया व पेरणीनंतर दीड महिन्याने बुरशी नाशकाची फवारणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाने उघडीप दिल्यानंतर पिक पाहणीसाठी कृषी अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. शुक्रवारी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कदम, मंडळ कृषी अधिकारी प्रमिला जंजिरे, अंगद सुडे यांनी रेणापूर तालुक्यातील पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करण्यात आले.