हॅलो कृषी ऑनलाइन : अवर्षण परिस्थिती, पाण्याचा ताण आणि हवामानातील बदल या प्रमुख कारणांमुळे महाराष्ट्रामध्ये मागील 10-12 वर्षात ऊस पिकामध्ये हुमणी या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. भारतात हुमणीच्या साधारणपणे 300 प्रजातींची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात प्रमुख दोन प्रकारच्या हुमणी आढळतात. त्यास नदीकाठावरील (लिकोफोलीस) आणि माळावरील (होलोट्रॅकिया) असे संबोधले जाते. तसेच मागील 3-4 वर्षात नवीन दोन प्रकारच्या हुमणी प्रजाती (फायलोग्यथस आणि अॅडोरेटस) आढळल्या आहेत. होलोट्रॅकिया सेरेटा या हुमणीच्या प्रजातीपासून मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या जातीचे वैशिष्ट्य असे आहे की, ही जात हलक्या जमिनीत व कमी पाण्याच्या प्रदेशात जास्त आढळते. होलोट्रॅकियाच्या प्रादुर्भावामुळे ऊसाच्या उगवणीत 40% पर्यंत नुकसान होते. तसेच ऊस उत्पादनात 15 ते 20 टनांपर्यंत नुकसान होते. यामुळे हुमणी कीडीचा बंदोबस्त योग्य वेळी करणे अत्यंत महत्वाचे आहे.
हुमणीच्या बंदोबस्तासाठी नैसर्गिक उपाय म्हणून रुईच्या पानांचा रस प्रभावी ठरतो का? याचे उत्तर आपण आजच्या लेखात करून घेणार आहोत त्याशिवाय हुमणीच्या बंदोबस्तासाठी उपाय कोणते करावे याची देखील माहिती घेणार आहोत…
हुमणी व्यवस्थापन:-
जैविक:-
1) मेटारायजिम आणी बिव्हेरिया हे जीवाणु वापरावेत.
नैसर्गिक:-
1)रुईचा पाला 4-5 kg घेऊन तो 20 लीटर पाण्यात उकळून घ्यावा व थंड झाल्यावर 200 लीटर पाण्यात टाकुन त्याची अळवणी करावी. (zbns)
पारंपारिक :-
1) पिक काढणी नंतर लगेच १५-२० से.मी. खोल बलराम किंवा लाकडी नागराने नांगरट करुन घ्यावी किंवा रोटर मारावा.
2) पावसाच्या पहिल्या सरीबरोबर भूंगे जमिनीतून बाहेर येण्यास सुरुवात होते. हे भूंगे संध्याकाळी 6:30 ते 9:00 वाजेपर्यंत कडुलिंबाच्या झाडावरती असतात. हा काळ त्यांच्या मिलनाचा असतो. अशा वेळेस कडुलिंबाचे झाड हलवावे. हलवल्याबरोबर झाडावरील पतंग(हुमणी) खाली पडतील ते गोळा करा आणी अर्धा तास रॉकेल मध्ये ठेवावे. अशाने पुढचे नुकसान टाळेल.
रासायनिक:-
1) क्लोरो 2 लिटर + सायापर्मेथरिन 0.5 लिटर ड्रेचिंग किंवा पाट पाण्यातुन सोडावे. काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकते.
2) बायरचे लेसेण्टा चांगले काम करू शकते. ऊस लागणी नंतर लगेच ड्रेंचिंग केल्यास चांगला परीणाम मिळतो आणि ऊसाची वाढ देखिल उत्तम होते .
3)सुमिटोमो यांचे DANTOTSU 100 ग्रॅम उत्तम आहे.
4) लेसेंटा २०० ग्रॅम व डेसिस १०० – २५० मिली ४०० लिटर पाण्यातुन आळवणी करावी .
टीप: – रासायनिक औषधे शेवटचा पर्याय म्हणून वापरावीत. कारण रसायनांमुळे जमिनीतील गांडूळ मरण पावतात. तसेच इतर उपयोगी जीव -जिवाणूंचा समूळ नाश होतो.
लेखक
शरद केशवराव बोंडे
जैविक शेतकरी