हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह भारतातील सर्वाधिक कृषी मालाची निर्यात (Agriculture Export) ही मुंबई येथील जेएनपीटी बंदरावरून होत असते. मात्र, आता बंदरावर येत असलेला निर्यातीचा भार लक्षात घेऊन, आता कोकणाला ऍग्रो हब बनवून कोकणातील बंदरांमधून निर्यात सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यासाठी एपीडाचे (कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण) संचालक व त्यांच्या पथकाने रत्नागिरीतील जयगड येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या बंदराचे (Agriculture Export) सर्वेक्षण केले आहे.
एपिडाकडून जयगड बंदराची पाहणी (Agriculture Export From India)
एपिडाचे संचालक परशराम पाटील आणि त्यांच्या पथकाने नुकतीच जयगडला भेट दिली. मंगळुरू ते जेएनपीटी यादरम्यानचे कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गोवा आणि कोकण हे ऍग्रीकल्चर कॉरिडॉर देशासाठी महत्त्वाचे आहेत. सध्यस्थितीत येथील कृषी उत्पादन जेएनपीटी बंदरातून निर्यात (Agriculture Export) होते. त्यामुळे या बंदरावर ताण वाढला आहे. कृषी माल नाशिवंत असतो. निर्यातीला विलंब झाला तर माल खराब होतो. शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे जेएनपीटी बंदरावरील ताण कमी होणे आवश्यक आहे. आणि त्याला पर्याय म्हणून अन्य बंदरातून निर्यात करणे आवश्यक झाले आहे, असे एपिडाने म्हटले आहे.
कृषी निर्यातीतील विलंब कमी होणार
मंगळुरू ते जेएनपीटी यादरम्यान केवळ कोकणातील जयगड हे एकमेव बंदर जेएसडब्ल्यू कंपनीमुळे वापरात येत आहे. त्यामुळे जेएनपीटी बंदरावरील ताण कमी करण्यासाठी जयगड बंदरातून कृषी निर्यात करण्याचा विचार सुरू झाला आहे. केंद्र सरकारची एपीडा आणि राज्य सरकारची मित्र (महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर रिफॉर्मेशन) या दोन संस्था संलग्नतेने हा विषय हाताळणार आहेत. त्यासाठी जेएसडब्ल्यू कंपनीने सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी नुकतेच पथकाने या बंदराचे सर्वेक्षण केले आहे. त्याचा अहवाल तयार झाल्यानंतर निर्यातीबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
कोकणात रोजगार वाढतील
जयगडमधून निर्यात सुरू झाली तर साधारण एक हजार कंटेनर येथून जाऊ शकतील. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल पडून न राहता वेळेवर बाहेर जाईल. कोकणात रोजगार उपलब्ध होईल. कृषी उत्पादनांना चांगला भाव मिळेल. निर्यातीला मोठी चालना मिळेल, असे एपीडाकडून याबाबत सांगितले जात आहे.