Farmers Success Story: सावकारी पाश तोडण्यासाठी, बदललेली शेती पद्धती ठरली फायदेशीर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतीचे उत्पादन खर्च वाढल्यामुळे बरेच शेतकरी (Farmers Success Story) कर्जाने सावकाराकडून भरमसाठ व्याजाने पैसे घेतात. आणि तो व्याज भरताना शेतकऱ्यांचे संपूर्ण उत्पन्न जाते. पण आज आपण अशा शेतकर्‍याबद्दल माहिती करून घेणार आहोत ज्याने हा व्याजाचा पाश तोडण्यासाठी शेती पद्धतीच बदलली (Farmers Success Story).

विश्वनाथ गोविंदराव होळगे, राहणार दापशेड, तालुका लोहा, जिल्हा नांदेड (Nanded District) या शेतकर्‍याजवळ 14 एकर जमीन आहे. आणि ही संपूर्ण शेती नैसर्गिक (Natural Farming) आहे.  त्यांच्या शेतात कोणतेच रासायनिक खत किंवा कीटकनाशक यांचा वापर होत नाही. त्याऐवजी गाईच्या शेणापासून, गोमुत्रापासून जीवामृत, घन जीवामृत, तांदळाचा वापर, नारळाच्या पाण्याचा वापर, झाडपाल्याचा वापर करून नैसर्गिक शेती करतात (Farmers Success Story).

होळगे हे 2014 पासून नैसर्गिक शेती करीत आहेत. त्यांच्या शेतात ते सर्व प्रकारची पिके घेतात.  यामध्ये हळद, अद्रक, गावरान लाल साळ, गावरान पिवळी ज्वारी, तूर मूग उडीद सोयाबीन यासोबतच कांदा, लसूण, दोडके, कारले, गवार, भेंडी, चवळी, टोमॅटो, पालक, मुळा, चुका, मेथी, आळू इत्यादी सर्व प्रकारची पिके आणि भाजीपाला घेतात. एवढेच नाही तर ते शेतात नवनवीन प्रयोग (Farmers Success Story) सुद्धा करतात व ते इतर शेतकऱ्यांना सुद्धा सांगतात.

शेती सोबतच ते पशुपालन (Animal Husbandry) सुद्धा करतात. त्यांच्याकडे 5 गाई, दोन बैल आणि एक म्हैस आहे.

परंतु पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. 2014 च्या आधी ते रासायनिक शेती करत होते. या शेतीत त्यांचा खर्च खूप व्हायचा. उत्पादन खर्चासाठी (Agriculture Production Cost) ते सावकाराकडून व्याजावर पैसे घेत होते.

होळगे सांगतात, “मी रासायनिक खते व औषधे सावकाराकडून आनीत होतो पण तो सावकार 50 हजाराचे 75 हजार रुपये घ्यायचा. आमचा माल आला की तो सावकार पैसे घेऊन जायाचा त्याला कंटाळून शेतीचा खर्च कसा कमी होईल ते पाहू लागलो”.

यावेळी त्यांच्या गावात रा. स्व संघ ग्राम विकासाचे काम करत होते. त्यावेळी 2014 मध्ये जालना येथे पद्मश्री सुभाष पाळेकर (Subhash Palekar) गुरुजींचे शिबिर होते त्या शिबिरात होळगे सहभागी झाले. 6 दिवस शिबिरात प्रशिक्षण घेतल्यावर त्यांनी पूर्ण शेती नैसर्गिक करण्यास सुरुवात केली. “रासायनिक खर्चामुळे व मानवाच्या आरोग्यासाठी मी नैसर्गिक शेतीकडे वळलो” असे होळगे सांगतात.

पुरस्कार आणि सन्मान (Farmers Success Story)

होळगे यांच्या नैसर्गिक शेतीच्या प्रवासात आतापर्यंत त्यांना आतापर्यंत 20 पेक्षा अधिक पुरस्कार आणि सन्मान मिळालेले आहे. यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांचा ‘उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार’, के. व्ही. के. सगरोळी येथील उत्कृष्ट शेतकरी म्हणून पुरस्कार सुद्धा त्यांना लाभला आहे. एवढेच नाही तर भारत सरकारच्या नीती आयोगाने त्याच्यावर लेख सुद्धा प्रकाशित केलेला आहे.   होळगे सांगतात की त्यांचा शेतीचा खर्च कमी झाला असून उत्पादन वाढले आहे. या नैसर्गिक शेतीमुळे ते पूर्णपणे समाधानी आहेत. नैसर्गिक शेती काळाची गरज आहे विषमुक्त अन्न हा प्रत्येकाचा अधिकार आहे. नैसर्गिक शेतीमुळे जल, जमीन, जंगल आणि पर्यावरणाचा समतोल राखला जातो.  

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.