पिकविमा परताव्यासह योजना शेतकरी हिताची करा ! परभणीतील शेतकऱ्यांची कृषी आयुक्त कार्यालयावर धडक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पिकविमा योजना शेतकरी हिताची करत मागील वर्षीचा पिकविम्या द्यावा या मागणीसाठीअखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात परभणी जिल्हातील शेतकऱ्यांचा मोर्चा आज कृषी आयुक्त कार्यालयावर धडकला.

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत आपल्या सर्व पिकांसाठी मागील वर्षी विक्रमी विमा संरक्षण घेतले होते. सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यात पीक कापणी वेळी सातत्याने अनेक दिवस लागुन राहिलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्वच खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले. या नुकसानी संदर्भात तक्रारी नोंद करावयास पहिले काही दिवस विमा कंपनीचे ऑनलाईन पोर्टल चालले. या वेळेत तक्रार दाखल होऊ शकलेल्या विविध तालुक्यातील विविध मंडळातील मोजक्या शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला. मात्र विविध कारणांमुळे पिकनुकसाची केवळ तक्रार दाखल न होऊ शकल्यामुळे नुकसान होऊनही लाखो शेतकरी पिकविम्यापासून वंचित आहेत .

यासाठी शासनाच्या कृषी व महसुल विभागाने केलेल्या पिक नुकसानीच्या पंचनाम्यांचा आधार घेऊन नुकसान कुणाचे झाले ते पाहून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक नुकसानीनुसार ज्या महसुलमंडळात ज्या प्रमाणात विमा कंपनीकडून पिक विमा वाटप झाला त्याच प्रमाणात त्या मंडळातील इतरही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविम्याचे वाटप व्हावे या व इतर मागण्यांसाठी जिल्हातील शेतकरी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयावर धडकले आहेत.

शेतकऱ्यांना तात्काळ पीकविमा देण्यात यावा

आंदोलक शेतकऱ्यांनी आरोप केला आहे कि, विमा कंपनीने नुकसानिच्या वस्तुस्थितीकडे सोयिस्कर डोळेझाक करून , केवळ नियमातील त्रुटी वर बोट ठेवून . इतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविम्यापासून वंचित ठेवले आहे असे म्हणत प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील सहभागी शेतकऱ्यांसाठी २०२० च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या सर्व पीक नुकसानीचे शासनाच्या महसूल विभागाने केलेले पीकपंचनामे गृहीत धरून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पीकविमा देण्यात यावा ,प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना जाचक ठरणाऱ्या अव्यवहार्य अटी शर्तीचा फेरविचार करून त्या वगळून ही योजना शेतकऱ्यांना झालेल्या पीक नुकसानाची भरपाई मिळण्यास सुलभ करावी व खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी पिक विमा नियमाप्रमाण २५ टक्के अग्रमी नुकसान भरपाई द्यावी या मागण्यासाठी आंदोलक शेतकरी पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयासमोर बसले आहेत .