हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसात राज्यात काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त पाऊस झाला आहे. राज्यातील अनेक भागात पावसाचे प्रमाण कमी झाला आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि खानदेशात पावसाच्या उघडीपीने चिंता अधिक वाढली आहे. राज्यात चालू आठवड्यात पावसाचं प्रमाण कमी राहणार असून पुढील आठवड्यात पावसाला पुन्हा सुरुवात होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Subdued rainfall very likely over rest parts of plains of northwest India (Punjab, Haryana, West Rajasthan) and most parts of Peninsular India, including Maharashtra & Gujarat state.
— India Meteorological Department (@Indiametdept) August 9, 2021
6 ते 12 ऑगस्ट या कालावधीत पावसाची दडी कायम
जुलै मध्ये गेले वीस दिवस कोकण आणि घाट माथ्यावर थैमान घातल्यानंतर जोर कमी होत पावसाने उघडीप घेतली. कोकण नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या धो-धो पावसाने रत्नागिरी, रायगड सह कोल्हापूर, सातारा, सांगली, जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती ओसरली. तर दुसरीकडं उत्तर मध्य महाराष्ट्रात यंदा अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या दोन आठवड्यांच्या अंदाजानुसार चालू 6 ते 12 ऑगस्ट या कालावधीत राज्यात पावसाची दडी कायम राहणार आहे.
१३ तारखेपासून पावसाला पुन्हा सुरुवात
येत्या 13 ते 19 ऑगस्ट या कालावधीत राज्याच्या बहुतांश भागात पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण काहीसे कमी राहणार आहे. तर उर्वरित राज्यात आठवड्याच्या सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. कोकणात जोरदार पाऊस पडणार असून दक्षिण मध्य महाराष्ट्र पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यात चांगल्या पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.