हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, राज्यातील उष्णतेची तीव्रता कमी झाली असून आज पासून पुढच्या तीन-चार दिवसांपर्यंत राज्यातल्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने दिली आहे. दरम्यान आज सकाळीच निरीक्षण केलेल्या हवामान अंदाजानुसार आज पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पुढच्या ३-४ तासांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावणाऱ्या या वेळी वाऱ्याचा वेग हाताशी 30 ते 40 किलोमीटर असेल आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. याबाबतची माहिती हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याची सूचना देखील आय एम डी मुंबई यांच्या वतीने देण्यात आली आहे.
दरम्यान पुणे आणि मुंबई या शहरांमध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळाले आहे. तर काही ठिकाणी हलका पाऊस झाल्याची ही माहिती आहे. पुढच्या तीन ते चार दिवसात दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यानुसार विविध जिल्ह्यांना यलो अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे.
21 एप्रिल – आज दिनांक 21 एप्रिल रोजी अमरावती आणि अकोला जिल्हा मध्ये पावसाची शक्यता आहे. अहमदनगर, पुणे ,सातारा, सांगली, रत्नागिरी ,सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद ,लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
22एप्रिल – दिनांक 22 एप्रिल साठी 12 जिल्ह्याला हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील गडचिरोली इथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसेल तर अहमदनगर, पुणे ,सातारा ,रत्नागिरी ,सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली ,सोलापूर ,उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
23 एप्रिल – दिनांक 23 एप्रिल रोजी पुणे, सातारा ,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली ,सोलापूर, उस्मानाबाद ,लातूर ,नांदेड आणि गडचिरोली या भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी गडचिरोली सोडता उर्वरित भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे.
या राज्यात येणार धुळीचे वादळ
दरम्यान इतर राज्यांचा विचार करता आजपासून मेघालया मध्ये पुढच्या पाच दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये 20 आणि 21 एप्रिल रोजी काही भागांमध्ये धुळीचे वादळ येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.