उभ्या सोयाबीनला फुटले कोंब ; पावसाच्या अवकृपेने शेतकरी हैराण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात यावेळी आणि असमान झालेल्या पावसाचा मोठा फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. मराठवाड्यात प्रतीचा पाऊसही धुमाकूळ घालीत असल्यामुळे आता सोयाबीनच्या उभ्या पिकाला कोंब फूट लागलेत त्यामुळे सोयाबीनच्या काढणीसंदर्भातच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शुक्रवारी रात्री मराठवाड्यातील उस्मानाबाद, हिंगोली, बीड जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे खरिपातील उर्वरीत पीकांची काढणी होणार की मोडणी ही अवस्था झाली आहे.

राज्याचा विचार करता राज्यांमध्ये सोयाबीनची पेरणी ही 53 लाख हेक्‍टरवर झाली आहे . यंदाच्या वर्षी तब्बल चौदा लाख हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांचा कल हा सोयाबीनकडे असतो. त्यातच सोयाबीनला चांगला भाव मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या वर्षी खरिपात सोयाबीन ची लागवड केली. मात्र ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेला पाऊस ऑगस्टच्या अखेरपर्यंत कायम आहे आणि आता सप्टेंबर मध्ये ही पाऊस सुरूच आहे त्यामुळे काढणीचे कामही रखडले असून सोयाबीन उत्पादकांचा आशा आता मावळल्या आहेत. पावसाचा सर्वाधिक फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसला आहे.

पावसाची अवकृपा

पावसाच्या अवकृपेमुळे उत्पादन तर नाही परंतु पेरणी आणि पीक जोपासण्यासाठी आलेला खर्चही निघणे आता शेतकऱ्यांसाठी मुश्किल झाले आहे. पावसाचा जोर कायम असताना हिंगोली, परभणी ,उस्मानाबाद जिल्ह्यातील उभ्या पिकाला आता कोंब फुटू लागले आहेत. शिवाय शेतामध्ये पाणी साचले असून अद्यापही पावसाचा जोर वाढतोच आहे. मराठवाड्यात पावसाची वार्षिक सरासरी 671. 6 मिलिमीटर आहे. आतापर्यंत 894. 8मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शिवाय परतीच्या पावसाचे आगमन अजून झालं नसल्याने भविष्यात शेतकऱ्यांसमोर काय समस्या उभी राहणार याची कल्पनाच न केलेली बरी. चार दिवसांपासून परभणी जिल्ह्यात पावसाचा थैमान आहे. तर उस्मानाबादेत पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. एकंदरीत खरीप हंगाम हातचा गेला असून या पिकांची काढणी करायची कशी असा सवाल आता शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे.