पुढच्या १२ तासात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता , काय होईल राज्यावर परिणाम ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील काही भागात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईसह कोकणात ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी हलका पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर विदर्भ, मराठवाड्यात उन्हाचा तडाखा कायम आहे. आज (21)सकाळी हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार अंदमान समुद्र आणि लगतच्या दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरावरील तीव्र चक्री वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. हे वादळ पोर्ट ब्लेअर पासून ११० किमी अंतरावर असेल तर निकोबार पासून ३२० किमी अंतरावर असेल. पुढील १२ तासात हे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबतची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे असे होसाळीकर यांनी सांगितले आहे.

पावसामुळे पुढील 2 दिवसांत तापमान 2 ते 3 अंशांनी खाली येण्याचे संकेत दिल्याने उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळू शकतो. पण, या चक्रीवादळाचा राज्यावर फारसा परिणाम होणार नाही.गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात उष्णतेमुळे नागरीक हैराण होते. विदर्भ, खानदेश, मराठवाड्यात उष्णतेचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला होता. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांनाही तोंड द्यावं लागत होतं. मुंबई, ठाण्यातही उष्णता वाढल्याने नागरिक घामाघूम होत आहेत.

काय होईल राज्यावर परिणाम ?
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला त्यानंतर मुंबईसह, कोकणात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. आजपासून २ दिवसात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतू पावसाच्या शक्यतेने बळीराजाचं टेन्शन वाढलं आहे. अवकाळी पावसामुळे हाती आलेल्या पिकांना फटका बसू शकतो. पावसाच्या शक्यतेने राज्यातील उष्णतेत घट होणार आहे. त्यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळणार आहे.