हॅलो कृषी ऑनलाईन : खरिप पिकांची काढणी झाली असून आता शेतकरी रब्बी पिकांच्या पेरणीसाठी शेत तयार करतो आहे. राज्यात मुख्यत्वे हरभरा, ज्वारी, गहू , मका अशा पिकांची लागवड करण्यात येते. रब्बी पिकांच्या काही पिकांच्या लागवडी झाल्या आहेत किंवा काही पिकांच्या सुरू आहेत. अशा वेळी खत व पाणी देण्याचे वेळापत्रक कटाक्षाने पाळल्यास निविष्ठाचा कार्यक्षम वापर होऊन उत्पादन चांगले मिळते.
खत व्यवस्थापन
रब्बी पीक व्यवस्थापनात माती परीक्षण करून आवश्यकतेनुसार खताची मात्रा द्यावी. रब्बी हंगामामध्ये रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी योग्य प्रकारे खते देणे आवश्यक असते.
1. गहू – वेळेवर पेरणीसाठी 100 ते 120 किलो नत्र, 50 ते 60 किलो स्फुरद व 50 ते 60 किलो पालाश वापरावे. शिफारशीपैकी अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणी वेळी द्यावे. नत्राची उर्वरित अर्धी मात्रा 21 दिवसांनी द्यावी.
2. रब्बी ज्वारी – कोरडवाहू ज्वारीसाठी हेक्टरी 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद, 20 किलो पालाश पेरणीपूर्वी किंवा पेरणीवेळी जमिनीत पेरून द्यावे.
– ओलिताखालील रब्बी ज्वारीस पेरणीच्या वेळी हेक्टरी 40 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 30 किलो पालाश द्यावे. पेरणीनंतर 30 दिवसांनी 40 किलो नग द्यावे. खते देताना जमिनीत ओल असावी.
4. सूर्यफूल – पेरणीवेळी हेक्टरी 30 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 30 किलो पालाश सरीमध्ये पेरून द्यावे किंवा तिफणीने पेरणी करावयाची असल्यास खतेसुद्धा पेरून द्यावी. पेरणीनंतर 30 दिवसांनी 30 कि. नत्र द्यावे.
5. हरभरा – कोरडवाहू हरभरा पिकासाठी 20 किलो नत्र व 40 किलो स्फुरद तर बागायती हरभरा पिकासाठी 25 नत्र व 50 किलो स्फुरद लागवडीच्या वेळेस द्यावे.
6. करडई – कोरडवाहू करडईसाठी 20 किलो नत्र, 20 किलो स्फुरद पेरणीवेळी द्यावे तर बागायती करडई पिकासाठी पेरणीवेळी 30 नत्र व 40 किलो स्फुरद द्यावे. व 30 दिवसांनी 30 किलो नत्र द्यावे.
7. मिरची – 50-50-50 नत्र, स्फुरद व पालाश द्यावे. लागवडीनंतर एक महिन्याने 50 किलो नत्र प्रति हेक्टरी द्यावे.
रब्बी पिकांची पाण्याची गरज
–पाण्याची बचत करण्यासाठी फळझाडास/उसास ठिबक संचाद्वारा पाणी द्यावे.
–पाण्याची कमतरता असल्यास पिकांना एकसरी आड पाणी द्यावे.