हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या उन्हाच्या झळा (Weather Update) सोसाव्या लागत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वरती असलयाचे पाहायला मिळत आहे. अशातच आता 28 मार्चनंतर वातावरणात बदल पाहायला मिळणार आहे. विदर्भात 28 मार्चनंतर सर्वच जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह पाऊस होण्याची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केला आहे. प्रामुख्याने विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी पावसाचा (Weather Update) इशारा देण्यात आला आहे.
उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळणार (Weather Update Today 26 March 2024)
राज्यात सध्या नागपूर, वर्धा, अमरावती, बुलढाणा, मालेगाव, अकोला, यवतमाळ, सोलापूर या ठिकाणी 40 अंशाहून अधिक तापमान (Weather Update) आहे. तर मागील 24 तासांमध्ये राज्यातील सर्वच भागांमध्ये 37 ते 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. ज्यामुळे सध्या राज्यात सर्वच जिल्हे तापले असून, उन्हाच्या झळांमुळे नागरिक बेजार झाले आहे.
त्यातच आता 28 मार्चनंतर राज्यातील विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पश्चिम-दक्षिण महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या खोऱ्यातील आसपासच्या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता आहे. ज्यामुळे आता उष्णतेचा लाटेपासून काहीसा दिलासा मिळणार आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून अनेकदा झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच आता पुन्हा एकदा विदर्भात पाऊस होणार असल्याने, शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे.
तीन दिवस ‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता
दरम्यान, पुढील 24 तासांमध्ये आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, सिक्कीम, उत्तर ओडिसा, पूर्व झारखंड, पूर्व विदर्भ, छत्तीसगड आणि अरुणाचल प्रदेशात विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये देखील पाऊस होण्याची शक्यता आहे. तर 26 मार्च ते 29 मार्चदरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि वायव्य भारताच्या लगतच्या मैदानी भागात पावसाची शक्यता आहे. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.