हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे राज्यातील गाईच्या दुध दरात (Milk Rate) पुन्हा घसरण झाली आहे. काही दिवसांपूर्वी दोन रुपयांनी वाढवलेले दर आता पुन्हा दोन रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे ३.५ टक्के फॅट आणि ८.५ एसएनएफ असलेल्या गाईच्या दुधाचा प्रति लिटर दर २९ रुपयांवरून २७ रुपयांपर्यंत खाली आला आहे. ज्यामुळे याचा राज्यातील दूध उत्पादक (Milk Rate) शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.
उष्णतेमुळे दूध उत्पादनात घट (Milk Rate Decrease In Maharashtra)
दुध उत्पादकांना दररोज तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान होत असल्याने आणि शासनाने नियुक्त केलेल्या समितीच्या शिफारसीप्रमाणे ३४ रुपये प्रति लिटर दर न मिळाल्याने संकट वाढले आहे. राज्यात दररोज साधारणपणे दोन ते सव्वादोन कोटी लिटर दूध उत्पादन होते. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई आणि तीव्र उष्णतेमुळे दूध उत्पादनात ३० ते ४० लाख लिटरपर्यंत घट झाली आहे.
दुग्धजन्य पदार्थांना मागणी असतानाही दर कमी!
अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा आणि विदर्भातील उन्हाळ्यात लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रमांमुळे दुग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी असते. मात्र, याच काळात दर कमी केल्याने शेतकरी पुरते त्रस्त झाले आहेत. गेल्या वर्षी याच काळात दुधाला प्रति लिटर ३५ रुपयांच्या आसपास दर होता.
दुधाचे दर कमी करण्यामागे काय कारणे?
दुध आणि दुग्धजन्य पदार्थांना मागणी नसल्याचे कारण पुढे करत खरेदीदार आणि दूध संघ दर कमी करत आहेत. यामुळे गेल्या सहा महिन्यांत दूध उत्पादकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. दुधाचे दर वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी सरकारने तातडीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी दूध उत्पादक संघटना करत आहेत. त्यामुळे आता दुधाचे दराबाबात नेमका काय तोडगा निघणार? याकडेच सर्वांचेच लक्ष असणार आहे.