हॅलो कृषी ऑनलाईन : मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल (Weather Update) पाहायला मिळत आहे. अशातच आता मंगळवार (ता.19) आणि बुधवार (ता.20) असे दोन दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह पाऊस होण्याची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या चक्राकार वाऱ्यांमुळे सध्या राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा परिसरावर 1.5 किलोमीटर उंचीवर आर्द्रतायुक्त वारे वाहत आहे. ज्यामुळे गेले तीन दिवस राज्यांमध्ये अनेक भागांमध्ये पाऊस पाहायला मिळत आहे. असेही हवामान विभागाने (Weather Update) म्हटले आहे.
‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Weather Update Today 19 March 2024)
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज (ता.19) विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नांदेड, लातूर, गडचिरोली या जिल्ह्यांना आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. अर्थात या जिल्ह्यांमध्ये आज गारपिटीसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.
मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान राहणार
तर बुधवारी (ता.19) विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, अमरावती आणि मराठवाड्यातील नांदेड या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील दोन दिवस पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील तीन दिवस वातावरण कोरडे राहणार आहे. तर मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र, संपूर्ण राज्यभरात पावसाचे वातावरण पूर्वपदावर येणार असून, हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
उष्णतेची लाट कायम
दरम्यान, राज्यात सध्या एकीकडे उन्हाचा उकाडा तर एकीकडे पावसाचे वातावरण असे काहीसे संमिश्र हवामान दिसून येत आहे. मुंबईसह कोकण पट्टा, दक्षिणेकडील सोलापूर आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये सध्या तीव्र उन्हाची ताप आहे. मागील 24 तासांमध्ये राज्यातील नाशिक, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्याचा भाग वगळता सर्व भागांमध्ये 35 अंशाहून अधिक तापमान नोंदवले गेले आहे. अर्थात अर्धा महाराष्ट्रात कडक उन्हात होरपळतोय तर अर्ध्या महाराष्ट्रात भर उन्हाळ्यात पावसाचे वातावरण पाहायला मिळत आहे.