Weather Update : राज्यात अवकाळी पावसाची शक्यता कायम; ‘या’ 17 जिल्ह्यांना आयएमडीचा इशारा!

Weather Update Today 21 May 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाच्या (Weather Update) सरी कोसळत असल्या, तरी काही भागात मात्र उकाडा कायम आहे. गेल्या दोन दिवसांपासून बहुतांश जिल्ह्याचे तापमान चाळीशीपार गेले आहे. धुळे आणि जळगावमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तर मुंबईत देखील चांगलाच उकाडा जाणवत आहे. अशातच नागरिकांना उकाड्यातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्र विभागाने आज (ता.21) राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. आजपासून पुढील 5 दिवस राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील, असे हवामान विभागाने (Weather Update) आपल्या अंदाजात म्हटले आहे.

‘या’ जिल्ह्यांना आयएमडीचा इशारा (Weather Update Today 21 May 2024)

या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, तर काही भागांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्हांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, अहमदनगर, नाशिक, सोलापूर जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. इतकेच नाही तर राज्यातील काही जिल्ह्यात गारपीट होऊ शकते, असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

कमाल तापमानात वाढ होणार

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबईसह, कोकणात आज उष्ण व दमट वातावरण असेल. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागू शकतो. पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे. पुढील दोन दिवसात राज्यातील कमाल तापमानात हळूहळू वाढ होणार असून, ते 2 ते 3 अंशांनी तापमान वाढणार आहे. तसेच त्यात पुन्हा घसरण होण्याचा अंदाज आहे. या तापमानातील वाढीमुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडयात कमाल तापमान 42 ते 44 अंशाच्या घरात जाण्याची शक्यता आहे. तर कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक तापमानाची नोंदवले जाण्याची शक्यता आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.