Climate Based Agriculture Advisory: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाद्वारा प्रसारित हवामान आधारित कृषी सल्ला!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या राज्यात मिश्र प्रकारचे हवामान (Climate Based Agriculture Advisory) सुरू आहे, कुठे तापमानात वाढ होताना दिसत आहे तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) थैमान घातलेला आहे. यावेळी हवामानानुसार पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने (VNMKV, Parbhani) मराठवाडा (Marathwada) विभागासाठी पुढील आठवड्यासाठी हवामान आधारित कृषी सल्ला प्रसारित केलेला आहे. जाणून घेऊ या सविस्तर (Climate Based Agriculture Advisory).

पुढील आठवड्याचे हवामान (Weather Update)

आज दिनांक 11 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, धाराशिव व लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी तर दिनांक 12 मे रोजी लातूर, नांदेड, छत्रपती संभाजी नगर, जालना, धाराशिव, बीड, हिंगोली व परभणी जिल्ह्यात दिनांक 13 मे रोजी लातूर, धाराशिव व नांदेड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

दिनांक 12 मे रोजी लातूर व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट (Hailstorm) होण्याची शक्यता आहे. दिनांक 14 मे रोजी लातूर, धाराशिव व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर कमाल तापमानात 1 ते 2 अंश.से. ने घट होण्याची शक्यता आहे (Climate Based Agriculture Advisory).

विस्तारीत अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 11 ते 16 मे दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची व 17 ते 23 मे दरम्यान पाऊस नाही, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

कृषी सल्ला (Climate Based Agriculture Advisory)

  • जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे.
  • उशीरा पेरणी केलेल्या उन्हाळी तीळ व उन्हाळी भुईमुग पिकास आवश्यकतेनुसार व जमिनीतील ओलाव्यानुसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करावा (Climate Based Agriculture Advisory).
  • उन्हाळी तीळाची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
  • सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. तुरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, हळदीची उघड्यावर साठवण करू नये. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी.
  • द्राक्ष बागेत एप्रिल छाटणी 15 मे पर्यंत करावी.
  • नवीन लागवड केलेल्या फळबागेमध्ये जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा व केळी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. बागेस सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. नवीन लागवड केलेल्या फळबागेमध्ये रोपांना शेडनेटच्या साहाय्याने सावली करावी.
  • नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची व केळी घडांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी.
  • तयार असलेल्या पिकांची, कांदा, टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी लवकरात लवकर करावी.
  • नवीन लागवड केलेल्या व लहान वेल वर्गीय झाडांना काठीने आधार द्यावा.
  • कमाल तापमानात झालेल्या वाढीमुळे, भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार व जमिनीतील ओलाव्यानुसार पाणी द्यावे.
  • पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा (तुषार किंवा ठिबक) वापर करावा.